
मुंबई-प्रतिनिधी | कार्तिकी एकादशीला येथील विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडणार आहे.
मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलकांच्या भूमिकेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
उपमुख्यमंत्र्यांच्या महापूजेवरून मराठा आंदोलकांमध्ये दोन गट पडले, तर दुसरीकडे कोळी समाजानेही उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत पंढरपुरात न येऊ देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. त्यानंतर प्रशासनाने मराठा आरक्षण आंदोलकांच्या सर्व गटांसोबत चर्चा केली.
यातील मराठा आंदोलकांसोबत सोमवारी रात्री उशिरा संपलेल्या बैठकीत दोन्ही गट एकत्र आले. बैठकीत खूप सकारात्मक चर्चा झाल्याने मंगळवारी प्रशासनासोबत एकत्रित मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली. मराठा आरक्षण आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकार्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिष्टमंडळाने पाच मागण्या समोर ठेवल्या. या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी आणि सरकारसोबत चर्चा करण्यासाठी प्रशासनाने थोडा वेळ मागून घेतला. काही वेळाने पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलकांसोबत बैठक पार पडली. त्यात प्रशासनाने मागण्या मान्य असल्याचे सांगितले.
या अनुषंगाने यंदा कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते शासकीय पूजा पार पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
Leave a Reply