
हैदराबाद-वृत्तसंस्था | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर हजारो कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. तेलंगणातल्या आरमुर येथे प्रचारसभेत बोलताना शहा यांनी केसीआर यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले.
याप्रसंगी अमित शाह म्हणाले की, ”आपल्याविरुद्ध कोणतीही कारवाई होणार नाही, या भ्रमात त्यांनी राहू नये. भाजप तेलंगणमध्ये सत्तेवर आल्यास या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल आणि दोषी ठरणार्यांना कारावासात पाठवले जाईल. हजारो कोटींचा भ्रष्टाचार करून ‘केसीआर’ यांना असे वाटत आहे की, त्यांच्याविरुद्ध काहीही होणार नाही. त्यांनी या प्रकरणी भ्रमात राहू नये. त्यांची घटका भरत आली आहे. या सर्व घोटाळयांची भाजप सरकारकडून चौकशी केली जाईल आणि दोषी ठरणार्यांना कारावासाची शिक्षा ठोठावली जाईल !”
दरम्यान, याप्रसंगी अमित शाह यांनी ‘मियांपूर जमीन घोटाळा’, ‘कविताजी यांचा मद्य घोटाळा’ ‘बाह्यवळण रस्ता घोटाळा’ आदींचा उल्लेख शहा यांनी यावेळी केला. तेलंगणमध्ये भाजप सत्तेवर आल्यास मुस्लिमांसाठीचा चार टक्के आरक्षित वाटा (कोटा) रद्द करण्यात येईल. त्याचा लाभ इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि अनुसूचित जमातींना देण्यात येईल. तसेच अयोध्या येथील राममंदिराच्या दर्शनासाठी मोफत अयोध्या वारी करण्याचे आश्वासनही शहा यांनी यावेळी दिले. या सभेला मोठ्या प्रमाणात मतदारांनी प्रतिसाद दिला.
Leave a Reply