
मुंबई-प्रतिनिधी | प्रसारमाध्यमांमधून सुरू असलेल्या वायफळ चर्चांना पूर्वविराम देत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपण केंद्रात जाणार नसून महाराष्ट्रातच राहणार असल्याचे सुनावले आहे.
सध्या प्रसारमाध्यमे तसेच सोशल मीडियातल्या एका वर्गाकडून देवेंद्र फडणवीस हे लोकसभेची निवडणूक लढवून केंद्रात जाणार असल्याच्या गावगप्पांना उत आलेला आहे. याला फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी ही शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. त्याच वेळी ‘राजकारणात १० दिवसांनी काय होईल, हे माहिती नसते. मात्र पुढील १० वर्षांनंतरही मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करीत असेन आणि पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन’, असे फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
याप्रसंगी त्यांनी निवडणुकांवर देखील भाष्य केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप कधीही तयार असून यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणुका स्थगित आहेत. त्या भाजपमुळे थांबलेल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जो निकाल लागला आहे, तोच या निवडणुकांमध्ये लागेल व भाजपला अतिशय उत्तम असे यश मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
Leave a Reply