
हैदराबाद-वृत्तसंस्था | बीआरएस आणि कॉंग्रेस हे दोन पक्ष स्वतंत्र दिसत असले तरी ते आतून एकच असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जोरदार टिकास्त्र सोडले आहे.
तेलंगणात होणार्या विधानसभा निवडणुकीचा प्रचारही अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज कॉंग्रेस आणि भारत राष्ट्र समितीवर जोरदार निशाणा साधला.
याप्रसंगी मोदीजी म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येने इथे येऊन तुम्ही सर्वांनी राजकीय जाणकारांना स्पष्ट संदेश दिला आहे की तेलंगणात भाजपवरचा विश्वास सतत वाढत आहे. तेलंगणा भाजपला संधी देण्यास येथील जनता तयार दिसत आहे. तसेच याप्रसंगी मोदीजींनी मतदारांना कॉंग्रेस आणि बीआरएसपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की बीआरएस आणि कॉंग्रेस एकमेकांवर आरोप करतात, परंतु दोघेही एकमेकांच्या जवळ आहेत. जर आपण इतिहास उघडला तर आपल्याला कळेल की त्यांचे नाते ४०-५० वर्षे जुने आहे. केसीआर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कॉंग्रेसमधून सुरुवात केली. २००४ मध्ये कॉंग्रेसने केसीआर यांना कॅबिनेट मंत्री केले. तेलंगणाची स्थापना झाली तेव्हा केसीआर कोणत्या पक्षात गेले होते? कॉंग्रेस ! यामुळे या दोन्ही पक्षांचे एकमेकांशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान मोदीजी पुढे म्हणाले की, बीआरएसने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूजींच्या विरोधात कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बीआरएसनेही कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. काही काळापूर्वी संसदेत आलेल्या आमच्या सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर बीआरएसने कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यामुळे बीआरएसची खरी मैत्री कॉंग्रेसशी असल्याचा आरोप मोदीजींनी याप्रसंगी केला.
Leave a Reply