पीक विम्याबाबत आंदोलनाचा अमोल शिंदे यांचा इशारा

पाचोरा प्रतिनिधी | शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यात न आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिला आहे.

अमोल शिंदे यांनी प्रशासनाला एका निवेदनाच्या माध्यमातून इशारा दिला आहे. यात म्हटले आहे की, सध्या खरीप हंगाम सुरू असून मागील महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे.यामध्ये प्रामुख्याने पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रमुख पीक कापूस,उडीद, मूग,सोयाबीन, ज्वारी,बाजरी,मका इ. पिकांची वाढ खुंटली असून पिके पूर्णपणे पिके करपली आहेत.शेतकर्‍यांचा पूर्ण हंगाम हातून निघून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान शेतकर्‍यांचे या माध्यमातून झालेले आहे.

यात पुढे म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यात साधारणता ४४,५०० शेतकर्‍यांनी व भडगाव तालुक्यातील २५,००० शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा काढलेला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या दि.२६ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील विविध निकषा व तरतुद नुसार शेतकर्‍यांना विमा संरक्षण दिलं जातं. यापैकी एक तरतूद (अ.क्र.१०.२) म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारं पिकांचं नुकसान. या तरतुदी अंतर्गत, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे पूर, पावसातील खंड, दुष्काळ यामुळे पिकांचं नुकसान झालं असेल आणि उत्पादन घटणार असेल,तर नुकसान भरपाई दिली जाते. यामध्ये,अपेक्षित विमा नुकसान भरपाईच्या २५ % मर्यादे पर्यंतची रक्कम आगाऊ स्वरुपात दिली जाते.

या अनुषंगाने शेतकर्‍यांना तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी अमोल शिंदे यांनी केली आहे. यावर विचार न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*