
जामनेर– सध्या जागतिक पटलावर देशाचे, विशेषतः महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते जामनेर येथे आयोजित नमो कुस्ती महाकुंभ – २ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
कुस्तीमधील महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसामुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स किंवा अन्य स्पर्धांमध्ये देशातील, विशेषतः महाराष्ट्रातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मॅटवरील कुस्तीमुळे आपण मागे पडलो होतो, मात्र मातीवरील कुस्तीमध्ये आपल्या खेळाडूंनी दमदार पुनरागमन केले आहे. देशाला ऑलिम्पिकमधील पहिले पदक मिळवून देणारे खेळाडू खाशाबा जाधव होते. आजही महाराष्ट्राचे विजय चौधरी, सोनाली मंडलिक, राजीव पटेल यांसारखे खेळाडू परदेशी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत जागतिक पातळीवर चमकत आहेत.”
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंचा थरार जामनेरमध्येया आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स, रोमानिया, इस्टोनिया, उझबेकिस्तान, जॉर्जिया आदी नऊ देशांतील जागतिक विजेते, ऑलिम्पियन, हिंदकेसरी, रुस्तम-ए-हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी अशा नामवंत कुस्तीपटूंनी सहभाग घेतला. त्यामुळे या स्पर्धेची प्रतिष्ठा आणि रंगत अधिक वाढली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत सांगितले की, “गिरीशभाऊ हेही कुस्तीपटू होते आणि त्यांनी विद्यापीठस्तरीय कुस्तीत उत्तम कामगिरी केली होती. आता राजकारणातही त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चित केले आहे!” असे त्यांनी मिश्कीलपणे नमूद केले.
महाराष्ट्राच्या पैलवानांचे वर्चस्वया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत परदेशी खेळाडूंवर वर्चस्व राखले. पृथ्वीराज पाटील, सोनाली मंडलिक, विजय चौधरी यांनी विजय संपादन करत महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला नवा सन्मान मिळवून दिला. त्यांच्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष अभिनंदन केले.
कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाबद्दल गौरवोद्गारया स्पर्धेचे आयोजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री आ. अनिल पाटील, आमदार राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी जिंकलेली पदके ही संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी गौरवाची बाब असते. कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ असून अशा स्पर्धांमुळे या खेळाचा विकास साधला जातो. भविष्यातही अशा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाईल.”
चांदीची गदा विजेत्यांना प्रदानकार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या कुस्तीपटूंना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा प्रदान करण्यात आली. हजारोंच्या संख्येने उपस्थित कुस्तीप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घेतला आणि खेळाडूंचे मोठ्या उत्साहात कौतुक केले. या स्पर्धेमुळे जामनेरचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव वाढला असून, भविष्यातही अशा स्पर्धांमधून महाराष्ट्राला जागतिक स्तरावर आणखी यश मिळवून देता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Leave a Reply