राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु- मुख्यमंत्री

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

शिवजन्मोत्सवानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते. विविध व्यवस्थापनाचे गुरु होते. शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले, म्हणून त्यांना आदर्श राजा, जाणता राजा आणि श्रीमंत योगी म्हणून ओळखले जाते.”

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकासकामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाहीत, याबाबत दक्षता घेतली जात आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील १२ गड किल्ले जागतिक वारसास्थळ नामांकनासाठी निवडले आहेत. हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन आणि पर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुने असून याबाबत पॅरिस येथील महासभेत सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड जागतिक वारसास्थळ होतील आणि जगभरातील लोक ते पाहण्यासाठी येतील, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुगल साम्राज्यात अनेक राजे आणि राजवाडे मांडलिकत्व पत्करत असताना मराठी मुलखात अनाचार, अत्याचार सुरू होते. माता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना याविरुद्ध प्रतिकार करून स्वराज्य स्थापनेची जबाबदारी दिली. छत्रपती महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून मावळ्यांची फौज तयार केली. त्यांनी देव, देश आणि धर्मासाठी संघर्ष करून स्वराज्य स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने भारताचा आत्मभिमान जागृत केला. आजच्या १४० कोटी लोकसंख्येच्या आत्मभिमानी भारतामागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा असून ते आमचे आराध्य दैवत आहेत.

येत्या पाच वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांचा ४०० वा शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे. किल्ले शिवनेरीच्या मातीतून स्वराज्याची स्फूर्ती आणि तेज मिळते. या प्रेरणेने राज्याची सेवा करण्याची संधी मिळते. राज्य शासनामार्फत शिवनेरी परिसरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू, असे श्री. फडणवीस म्हणाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*