
पुणे- प्रतिनिधी । महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कुस्तीच्या विकासासाठी आवश्यक सर्व सुविधा राज्य शासन उपलब्ध करून देईल. शासन मल्लांच्या पाठशी असून त्यांनी राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करून देत राज्याचा गौरव वाढवावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानावर आयोजित ६६ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी २०२३-२४ स्पर्धेस भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार दीपक पायगुडे, बापूसाहेब पठारे, भीमराव धोंडे, स्पर्धेचे आयोजक प्रदीप कंद, संदीप भोंडवे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्राचे वैभव आहे. राज्यात नामवंत पैलवान या स्पर्धेतून तयार होतात. देशात महाभारत काळापासून कुस्तीची परंपरा आहे. राज्यालादेखील कुस्तीची मोठी परंपरा आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकचे पहिले पदक कुस्तीमध्ये मिळवून दिले. आज मात्र महाराष्ट्राच्या पैलवानाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळत नसल्याने कुस्तीगीर परिषदेला त्यासाठी मोठे काम करावे लागेल.
श्री. फडणवीस पुढे म्हणाले, मागील महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मल्लांचे मानधान वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला. हिंद केसरी आणि रुस्तम ए हिंदचे मानधन ४ हजारावरून १५ हजार रुपये, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे मानधन ६ हजारावरून २० हजार, वयोवृद्ध खेळाडूंचे मानधन अडीच हजारावरून साडेसात हजार रुपये केले. खुराकाचा खर्च ३ हजारावरून १८ हजार रुपये केला. वेगवेगळी साधने घेता यावे यासाठी अनेक योजना सुरू केल्या. भविष्यातदेखील राज्य शासन मल्लांच्या पाठीशी उभे राहील, असेही ते म्हणाले.
Leave a Reply