
नागपूर-प्रतिनिधी | ठाकरे गटाने केलेल्या टिकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत किमान दिवाळीच्या कालखंडात तरी राजकारण करू नका असे सुनावले आहे.
मुंब्रा मधील ठाकरे गटाची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आल्याने वाद सु रू आहेत. या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरेंना राजकारणाशिवाय काहीच दिसत नाही, असा टोला लगावला. या संदर्भात, बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना कायमच राजकारण दिसतं. कोणत्याही मुद्द्यावर राजकारण करायचं ही त्यांची जुनी सवय आहे. आता दिवाळीचा उत्सव सुरू आहे. अशात ठाकरे यांना घटनास्थळी जाण्याची काहीच गरज नव्हती. तातडीनं गेले नसते तर काही बिघडलं असतं काय. परंतु ठाकरेंना राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडवायची आहे. त्यामुळं त्यांनी मोठ्या जमावासह हा परिसर गाठला अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.
दरम्यान, ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते घरात बसले. आता घरातून बाहेर निघत ते महाराष्ट्राचं वातावरण बिघडवत आहेत. त्यांच्या या कृतीमुळं मुंब्रातील नागरीकांची चांगलीच गैरसोय झाली. प्रत्येक गोष्टीत ठाकरे यांनी राजकारण आडवं आणणं योग्य नाही. ठाकरे यांच्या अशाच कृतीमुळे त्यांचे पद गेलं. कुठं, केव्हा काय करायचं आणि काय टाळायचं याचं भान त्यांना असलं पाहिजे. केवळ स्वत:ला नेता म्हणनुव घेतल्यानं काही होत नाही. नेत्याच्या जबाबदार्याही समजून घेतल्या पाहिजे. नेत्यांची काही कर्तव्य असतात, ती देखील पूर्ण करायला हवी असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
Leave a Reply